Tuesday 20 March 2012

SACHIN TENDULKAR

Sachin Tendulkar .

alt‘सचिन रमेश तेंडुलकर’ या नावाची वेगळी ओळख क्रिकेटविश्वाला करून देण्याची गरज नाही. आपल्या अद्वितीय कर्तृत्वाने त्याने सर्वानाच मोहिनी घातली आहे. अनेक उत्तुंग शिखरे, मैलाचे दगड त्याने पादाक्रांत केलेले आहेत. एवढय़ा उंचीवर पोहोचल्यावरही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. सचिनसाठी क्रिकेट म्हणजे काय, भारतरत्नबद्दल काय वाटते, यांसारख्या अनेक प्रश्नांवर त्याने खास ‘लोकसत्ता’शी दिलखुलासपणे बातचीत केली-
* तू यशाच्या शिखरावर पोहोचूनही तुझे पाय जमिनीवर आहेत, याचे कारण काय?
माझ्यावर झालेले संस्कार हे या मागचे सर्वात मोठे कारण आहे. याचे सारे श्रेय मी माझ्या घरच्या ‘टीम’ला देईन. आई-बाबांनी लहानपणापासून माझ्यावर चांगले संस्कार केले. त्यांचे राहणे, वागणे, बोलणे, विचारसरणी, दृष्टिकोन याचा माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर भाऊ आणि बहिणी यांचाही माझ्यावर प्रभाव आहे. त्याचबरोबर त्यावेळचे वातावरण, मित्र, राहणीमान या सर्वामुळे हे होऊ शकले, नाही तर ते शक्यच नव्हते. या संस्कारांमुळेच मी एवढी वर्षे टिकू शकलो, यशस्वीही झालो. लहान मुलगा एका ‘स्पंज’सारखा असतो. जे त्याच्याबाबतीत घडते, जे तो ‘आत्मसात’ करतो, तसा घडत जातो. माझ्याबरोबरही तसेच झालेले आहे.
* तू मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलास, आता सेलिब्रेटी झालास, आता सामान्य माणसासारखे वागता येत नाही, याचा त्रास होता का?मध्यमवर्गात वाढल्याचे मला बरेच फायदे झाले, ते मी कधीही विसरू शकत नाही. हे सारे होत गेले. क्रिकेट खेळत राहिलो, एकामागून एक मिळत गेले, त्यामुळे त्याचा जास्त त्रास होत नाही. पण कधीतरी मध्यमवर्गीय माणसासारखे वाटते आणि ते करता येत नाही. सामान्य आयुष्य जगता येत नाही, ते जगता यावे, असे नक्कीच कुठे तरी वाटते.
*  तुझ्यासारखे महान खेळाडू विश्वविक्रमांच्या मागे धावत नाहीत. ते एक स्वप्न पाहतात, ते जगतात आणि सर्वाना जगवतात. एक ध्येय ते डोळ्यापुढे ठेवतात आणि त्याचा पाठलाग करतात, असे कोणते ध्येय किंवा स्वप्न तुझे आहे?
विक्रमांचा मी कधीही विचार केला नाही, करत नाही आणि करणार नाही. मी पहिले स्वप्न लहानपणी पाहिले ते भारतासाठी खेळण्याचे, ते पूर्ण झाले. मी सुनील गावसकर यांची फलंदाजी पाहात वाढलो, त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरस्थावर झालो, तेव्हा त्यांच्या ३४ षटकांचा विक्रम मोडावा असे वाटले होते, तेही पूर्ण झाले. त्यानंतर बराच काळ क्रिकेट खेळल्यावर विश्वचषक विजयाचे स्वप्न पाहिले, ते गेल्यावर्षी पूर्ण झाले. आता कोणतेही स्वप्न अद्याप बघितलेले नाही, पण तरीही मी निष्काळजी अजिबात नाही. प्रत्येक सामना हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. स्वप्न बघा, ती बघून नुसती सोडू नका, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, मेहनत घ्या, झटा, विश्वास ठेवा स्वप्न पूर्ण होतात. सध्या एकच ध्येय आहे, जे  मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे आणि ते म्हणजे आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाला विजय मिळवून द्यायचा. हेच माझे अंतिम ध्येय आहे. 
-‘लोकसत्ता’ला खास मुलाखत
                                           

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...